marathi blog vishva

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

-------------------------------------------------------------------------------------------
निर्भीड व्हा----३५
थोबाडीत देणे
वयाच्या कोणत्या वर्षात "थोबाडीत देणे" सहन करावे लागते, त्याप्रमाणे त्याची दाहकता असते. शालेय शिक्षणात साधारणपणे आठ दहा वेळा तरी थप्पड खावी लागते. आपण म्हणतो की त्याचे काही एवढे वाटत नाही, पण ज्याला थप्पड बसते त्याला ती फार अपमानास्पदच वाटते. म्हणून तर "थोबाडीत देणे" हा प्रकार इतका मोलाचा असतो. एखाद्या पोरीने मुलाला थप्पड दिली की तो त्या दिशेने कधी जाणार नाही, इतकी ही थप्पड प्रभावी असते. कायद्याने हा हल्ला मानावा, तर ह्यात फारशी काही शारिरिक इजा होत नाही. ही काही फार गंभीर हिंसा नसते. शारिरिक दु:खापेक्षा अपमानच ज्यास्त असतो. कोणत्याही वादावादीत अगदी जालीम प्रत्युत्तर म्हणजे "थोबाडीत देणे" हेच असते. आपण ते नेहमीच देऊ शकत नाही, हा भाग वेगळा. पण कित्येक वेळा वादाची परमावधी थोबाडीत देण्यात व्हावी असे आपल्याला नेहमीच वाटते. केवळ ह्याच सामाजिक परिणामामुळे मराठी शब्दकोशात "थोबाडीत देणे" ह्याचा अर्थ "चांगली अद्दल घडविणे" असाही देतात.
आपण ज्याला थोबाडीत देतो त्याचा अपमान करीत असतो. आता ह्या हरविंदर ह्या गृहस्थाने मागच्याच आठवड्यात सुखराम ह्या ८६ वर्षांच्या माजी मंत्र्याला थोबाडीत दिले होते. कोण आहेत हे सुखराम. हे फार पूर्वी दूर-संचार मंत्री होते. ह्यांच्यावर नाना भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सीबीआयची रेड पडली तेव्हा ह्यांच्या घरात इतके पैसे होते की, ते ठेवायला ह्यांच्या घरी कपाटे अपूरी पडल्याने चार पाच कोटी रुपये चादरीत गुंडाळून देवघरात ठेवलेले सापडले होते. त्यानंतर त्यांच्यावर रीतसर खटले भरून आता ८६व्या वर्षी ह्यांना ५ वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांना तिहार जेलमध्ये राजाच्याच कोठडीत ठेवले आहे. अशा माणसाला कसला आला आहे मान आणि अपमान. आता अशा निगरगट्ट भ्रष्टाचार्‍याला कोणी थोबाडीत दिले तर अजून काय मोठा अपमान होणार आहे ? खरे तर तो थोबाडीत देण्याचाच अपमान होईल. जेव्हा काही अघटित घडते तेव्हा आपण म्हणतो की "मेरूला मुंग्यांनी तर गिळले नाही ना" ? तर अशीच परिस्थिती सध्याच्या राजकारणात आलेली आहे. वाईट माणसांनी चांगल्यांची इतकी गळचेपी केलेली आहे की अशांना थोबाडीत दिली तर ती थप्पड मारण्याचाच अपमान व्हावा.
थप्पड खाल्लेला माणूस त्यावर काय प्रतिक्रिया देतो त्यावरून त्या माणसाची नीतीमत्ता दिसून येते. शाळेतला एखादा कोडगा मुलगा असेल तर तो हमखास थोबाडीत दिल्यावरही म्हणेल "काहीच लागले नाही !". एखाद्याचा खरेच अपमान झाला असेल, तर तो चक्क रडेलच. थप्पड खाणार्‍याला राग तर हमखास येतोच. आता त्यावर तो बदला घेवो अगर न घेवो, पण राग आलाच पाहिजे. एवढी वर्षे मानाची पदे भूषविल्यावर, जीवनाच्या शेवटी कोणावर थोबाडीत खाण्याचा प्रसंग यावा ह्याचा खरे तर रागच यायला हवा. कोणी साने गुरुजींचा वा येशू ख्रिस्ताचा अवतार असेल तर ती गोष्ट वेगळी व त्याने जरूर म्हणावे की "ह्या वेड्याला तो काय करतोय ते कळत नाही म्हणून हे देवा तू ह्याला माफ कर". तर तो भाग वेगळा. पण ह्या वयातही जे निरनिराळ्या लव्हासासारख्या योजनांच्या आकांक्षा बाळगून आहेत, राजकारणातल्या धामधुमीत अजूनही व्यस्त आहेत, त्यांना ह्याचा रागच यायला हवा होता. त्यांनी लगेच ट्विटरवर असे का म्हणावे, की "लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा हक्क आहे, फक्त तो रास्त मार्गाने मांडावा !" आता थोबाडीत देणारा काय आपले म्हणणे मांडत असतो काय, की जे आवाजी मतदानाने तुम्ही ते नेहमीच फेटाळून लावू शकता ? त्याचे थोबाडीत देणे हा त्याने दिलेला सणसणीत निकाल असतो. आम्ही चर्चेला तयार आहोत असे सत्ताधारी पक्षाने म्हणणे हे नेहमीच त्यांची समजूत दाखवते असे नसून सध्याच्या काळात ती "तुम्ही काहीही मांडा, आम्हाला काही फरक पडत नाही" अशी सत्तेची उद्दाम मग्रूरीच ते वागण्याने दाखवीत असतात. सामाजिक काम करणार्‍याने, "हे चालायचच" असं म्हणून कोडगे होता कामा नये. जनाची नाही तर मनाची थोडी राखायलाच हवी व आपल्या वागण्याची तपासणी करून परत कोणी असे करू धजणार नाही असे वागणे हवे ! हे कोणा माथेफिरूचे काम नसून तुमच्या वर्तुणुकीवर उमटलेला दैवी संकेत आहे असेच हे समजायला हवे !

-------------------------------------------------

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

----------------------------------------------------------------------
निर्भीड व्हा---३४

श्लीलतेची भंवरी
सध्या राजस्थानात एक प्रकरण खसखसते आहे. एक भंवरी देवी नावाची नर्स/सुईण एका खेडयातील असते. ती हळूहळू इतकी प्रसिद्ध होते की तिचे एका मंत्र्याबरोबर संबंध जमतात. त्याच्या सीडीज इकडेतिकडे फिरतात. व एका क्षणी ती गायब होते. आता तिचा नवरा तिचा खून झाला असल्याची व तो मंत्र्यानेच केला असावा अशी शक्यता वर्तवतो आहे. ह्या प्रकरणात कदाचित मुख्यमंत्र्यांनाही राजिनामा द्यावा लागेल इतके हे प्रकरण गंभीर होत चालले आहे.
आज ह्या मंत्र्याच्या ( मदेरणा ) बायकोने मंत्र्याचा मोठा छान बचाव केला आहे. ती म्हणतेय की ठीक आहे, मंत्र्याचे होते भंवरीदेवी बरोबर संबंध. पण त्यात अश्लील व बेकायदेशीर असे काय आहे ? ह्याला म्हणतात खरी निर्भीडता ! आता सत्ता म्हटले की त्याचा उपभोग घेणे क्रमप्राप्तच नाही का ? सत्ता आहे, त्या बळावर समजा भरपूर पैसा-लत्ता कमावला, गाडी-बंगला-शेती वगैरे रीतीप्रमाणे कमावून झाले. तर माणसाने अजून काय करावे ? सगळ्यात ज्यास्त सुख कशात मिळते ? चांगले-चुंगले खाण्यापिण्यात, चांगले-चुंगले कपडे लेण्यात, चांगले घरदार बाळगण्यात, चांगले पिण्यात, का चांगला-चुंगला संभोग करण्यात ? आपण कबूल करीत नाही, इतक्या पटकन्‌, पण संभोगातच सुखाची परिसीमा असणार. म्हणूनच तर...
इंटरनेटवर एक इंदिरा गांधी ह्यांची बदनामी करणारी एक बातमी सारखी फिरत असते.. आता हे सगळे बदनामीकारक असले तरी प्रत्येकाला आपले कामजीवन आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार जगात कुठेही नाकारल्या जात नाही हेच दाखवते.
प्रश्न असतो तो हे कामजीवन किती व कसे खाजगी राखायचे ? आपले मराठ्यांचे एव्हढे मोठे साम्राज्य होते, पण ते लयास जाण्यास पेशव्यांचे "बावन-खणी" उद्योग व खाण्यापिण्याचा सोस कारणीभूत झाला, हे आपल्याला समजतेच. वि.का.राजवाडे ह्यांचे "भारतीय लग्नसंस्थेचा इतिहास" नावाचे पुस्तक वाचले तर आपल्या पूर्वजांच्या कामजीवनाचे विचित्रपण थक्क करणारे व आजच्या नैतिकतेने लाज आणणारे वाटावे असे आहे. पिढ्यान्‌ पिढया कामजीवनात लोकांचे वागणे हे सैलपणाचेच दिसून येईल. एव्हढेच काय मानववंशशास्त्र तर सांगते की जगातला पहिला व्यवसाय हा वेश्याव्यवसायच होता, इतके ह्या कामजीवनाचे दाखले आहेत. आता सोनिया गांधींना आपले कामजीवन कसे गुप्त ठेवावे हा मोठाच कूट-प्रश्न असणार. बिचार्‍या राहूलचीही तीच अडचण, कोणालाही समजून येईल. श्लील-अश्लीलता ही बहुतेक वेळा प्रकरण उघडकीस येते का गुप्त राहते ह्यावरच अवलंबून असते.
कायद्याने तर दोन व्यक्तींच्या परवानगीने केलेले कुठलेही वर्तन हे कायदेशीरच असते व मग ते श्लील आहे का अश्लील हे ठरवण्यासाठी त्या त्या काळचे समाज हे श्लीलतेच्या समजुतींना धडका देत राहतात व त्यांच्या कुवतीप्रमाणे त्याचे परिणाम भोगतात. पण कामजीवनाबद्दल तटस्थतेने बोलायचे म्हणजे खरा निर्भीडपणा लागतो हे मात्र खरे !

----------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------------------------------------------