marathi blog vishva

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

----------------------------------------------------------------------
निर्भीड व्हा---३४

श्लीलतेची भंवरी
सध्या राजस्थानात एक प्रकरण खसखसते आहे. एक भंवरी देवी नावाची नर्स/सुईण एका खेडयातील असते. ती हळूहळू इतकी प्रसिद्ध होते की तिचे एका मंत्र्याबरोबर संबंध जमतात. त्याच्या सीडीज इकडेतिकडे फिरतात. व एका क्षणी ती गायब होते. आता तिचा नवरा तिचा खून झाला असल्याची व तो मंत्र्यानेच केला असावा अशी शक्यता वर्तवतो आहे. ह्या प्रकरणात कदाचित मुख्यमंत्र्यांनाही राजिनामा द्यावा लागेल इतके हे प्रकरण गंभीर होत चालले आहे.
आज ह्या मंत्र्याच्या ( मदेरणा ) बायकोने मंत्र्याचा मोठा छान बचाव केला आहे. ती म्हणतेय की ठीक आहे, मंत्र्याचे होते भंवरीदेवी बरोबर संबंध. पण त्यात अश्लील व बेकायदेशीर असे काय आहे ? ह्याला म्हणतात खरी निर्भीडता ! आता सत्ता म्हटले की त्याचा उपभोग घेणे क्रमप्राप्तच नाही का ? सत्ता आहे, त्या बळावर समजा भरपूर पैसा-लत्ता कमावला, गाडी-बंगला-शेती वगैरे रीतीप्रमाणे कमावून झाले. तर माणसाने अजून काय करावे ? सगळ्यात ज्यास्त सुख कशात मिळते ? चांगले-चुंगले खाण्यापिण्यात, चांगले-चुंगले कपडे लेण्यात, चांगले घरदार बाळगण्यात, चांगले पिण्यात, का चांगला-चुंगला संभोग करण्यात ? आपण कबूल करीत नाही, इतक्या पटकन्‌, पण संभोगातच सुखाची परिसीमा असणार. म्हणूनच तर...
इंटरनेटवर एक इंदिरा गांधी ह्यांची बदनामी करणारी एक बातमी सारखी फिरत असते.. आता हे सगळे बदनामीकारक असले तरी प्रत्येकाला आपले कामजीवन आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार जगात कुठेही नाकारल्या जात नाही हेच दाखवते.
प्रश्न असतो तो हे कामजीवन किती व कसे खाजगी राखायचे ? आपले मराठ्यांचे एव्हढे मोठे साम्राज्य होते, पण ते लयास जाण्यास पेशव्यांचे "बावन-खणी" उद्योग व खाण्यापिण्याचा सोस कारणीभूत झाला, हे आपल्याला समजतेच. वि.का.राजवाडे ह्यांचे "भारतीय लग्नसंस्थेचा इतिहास" नावाचे पुस्तक वाचले तर आपल्या पूर्वजांच्या कामजीवनाचे विचित्रपण थक्क करणारे व आजच्या नैतिकतेने लाज आणणारे वाटावे असे आहे. पिढ्यान्‌ पिढया कामजीवनात लोकांचे वागणे हे सैलपणाचेच दिसून येईल. एव्हढेच काय मानववंशशास्त्र तर सांगते की जगातला पहिला व्यवसाय हा वेश्याव्यवसायच होता, इतके ह्या कामजीवनाचे दाखले आहेत. आता सोनिया गांधींना आपले कामजीवन कसे गुप्त ठेवावे हा मोठाच कूट-प्रश्न असणार. बिचार्‍या राहूलचीही तीच अडचण, कोणालाही समजून येईल. श्लील-अश्लीलता ही बहुतेक वेळा प्रकरण उघडकीस येते का गुप्त राहते ह्यावरच अवलंबून असते.
कायद्याने तर दोन व्यक्तींच्या परवानगीने केलेले कुठलेही वर्तन हे कायदेशीरच असते व मग ते श्लील आहे का अश्लील हे ठरवण्यासाठी त्या त्या काळचे समाज हे श्लीलतेच्या समजुतींना धडका देत राहतात व त्यांच्या कुवतीप्रमाणे त्याचे परिणाम भोगतात. पण कामजीवनाबद्दल तटस्थतेने बोलायचे म्हणजे खरा निर्भीडपणा लागतो हे मात्र खरे !

----------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा