marathi blog vishva

रविवार, २३ जानेवारी, २०११

प्रजासत्ताकाची लपालपी !
आपल्याला लहानपणचे खेळ इतके आवडतात की आपण मोठे झाल्यावरही तेच खेळत राहतो . असाच एक खेळ आहे, लपालपीचा "प्रजासत्ताकाची लपालपी !"
ह्यात लपण्याची पाळी असते प्रजेची. त्यांना शोधण्याचे ( जसे चोर-पोलीसमधले पोलीसाचे राज्य ) काम कोणालाच नको असते. मग सगळेच लपणारे ! आपण मुळी शहरात राहतो तेच लपण्यासाठी. म्हणजे पहा हं, एखाद्याला गुन्हा करून पसार होताना कुठे लपायचे असेल तर तो कुठे लपेल ? गावी गेला तर ईन-मीन एवढीसी घरं. बरं त्यात हा कोण नवीन आलाय, असं पटकन नाही का ओळखल्या जायचा ? त्यामुळेच तो लपतो, शहरात. मुंबई बेस्ट. इथे अगदी आरामात लपता येतं. कोण कोणाला ओळखत नाही. ए-विंग मधला बी-विंगवाल्याला, एक नंबरातला दोन नंबरला, गोरा काळ्याला असे कोणीच कोणाला ओळखत नाही. म्हणूनच तर कसे सगळे, चोर-लफंगे-साधू-बिधू , गुण्या गोविंदाने राहू शकतात.
अशीच सोय आहे प्रजासत्ताकाच्या लपालपीची ! आता प्रजा कुठे लपते ते पहा हां ! मागच्या निवडणुकीत सगळ्यात अधिक जागा मिळवून निवडून कोण आलं ? सोनिया गांधी. आता तिची सत्ता. पण ती स्वत: लपली कुठे ? तर मनमोहनसिंहाच्या पगडी मागे. खरे राज्य तर हिचेच आहे, पण करतेय कोण ? तर पंतप्रधान मनमोहन सिंह ! बरं, निवडणुकीत म्हणे प्रजेतल्या एकाला निवडून यावे लागते . तसे ते निवडून आले आहेत का ? आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री, चौहान हे तरी निवडून आलेले आहेत का? नाही, पण येतील यथावकाश !
कंपनीचे मालक हे तर खरे म्हणजे कंपनीचे सर्वेसर्वा ! पण ते कुठे लपतात ? तर चीफ एक्झीक्युटीव्ह च्या मागे. का ? उगीच कशाला आपण रोषाचे धनी व्हा ? मुख्य अधिकारी बरा की. शिवाय ते मिळतातही पैशाला पासरी ! घरचा कर्ता कोण ? तर पुरुष , बाबा. ते कुठे लपतात ? आईच्या मागे. "अगं तू ते रेशन-कार्ड घेऊन ये बरं का, कुटुंब प्रमुख म्हणून माझ्याजागी फॉर ची सही कर म्हणजे झालं !"
शिक्षक कुठे लपतात ? विद्यार्थ्यांच्या मागे . "अहो अभ्यासच करत नाहीत, शाळेचा रिझल्ट चांगला कसा लागणार ?"
प्रजासत्ताकात म्हणे प्रजेचे, प्रजेसाठी, प्रजेकडून राज्य चालते. मतेच मुळी कोणाची ते कळत नाही. अल्पसंख्यांकांना सवलती दिल्या, त्यांचे लांगुलचालन केले की ते एकगठ्ठा मते देतात. मग निवडून कोण आणते ? अल्पसंख्यांक. मग त्यांच्याच जोरावर बहुजनांवर राज्य करणे सोपे नाही का ? म्हणायला भारतात हिंदू ८४ टक्के. राज्य कोणाचे ? सोनिया ह्या इटालियन ख्रिश्चन बाईचे. पंतप्रधान कोण ? शीख . विरोधी पक्ष कोण ? हिंदुत्व-वादी.
महाराष्ट्रात नुकताच आपण मुख्यमंत्री नवा आणला. तो लोकांनी निवडून दिलाय का? नाही , पण देतील निवडून यथावकाश ! हाच का ? ह्याचे वडील नेहरूंच्या मंत्रीमंडळात होते, आईही आमदार होती... हा अजून निवडून आला नाहीय, तर ह्याला कोणी केला मुख्यमंत्री ? सोनियाजींनी. त्यांची सासू एकेकाळी पंतप्रधान नव्हती का ? इंदिरा गांधी . अहो, ती पहिल्या पंतप्रधानांची, जवाहरलाल नेहरूंची मुलगी ना ! आता लवकरच ह्याच घराण्यातला राहूल गांधी गादीवर येणार आहे .
अगं अगं प्रजे, लवकर लप ! आज आहे प्रजासत्ताकाची लपालपी !

------अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

निर्भीड व्हा----२१
"हिंदूंसाठी आता साचर समीती हवी !"
स्वामी असीमानंदांच्या कबूलीनाम्याने एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ते आता सर्वच बॉंम्बस्फोटात संबंधित होते असे उघडकीस येत आहे. तसेच त्यांच्याबरोबर इतके प्रचंड हिंदू लोक गुंतलेले आहेत की मालेगाव, मक्का मसजिद, समझौता एक्स्प्रेस अशा अनेक स्फोटांमागे हेच असीमानंद व हिंदू आतंकवादी होते असे चित्र स्पष्ट दाखविले जात आहे. असे एकाएकी हिंदू लोक इतके आतंकवादी कसे काय झाले असतील ह्याचा शोध घेतलाच पाहिजे.
हेच काम पूर्वी श्री. साचर ह्यांच्या समीतीने केले होते. पण ते होते मुस्लिम आतंकवाद्यांविषयी. त्यात त्यांनी मुस्लिम समाजाचा संपूर्ण आढावा घेतला होता व असे दाखविले होते की ह्या समाजाला बरे शिक्षण मिळत नाही, त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नोकर्‍या मिळत नाहीत, संसदेत त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही, हा समाज म्हणून मग ज्यास्त करून गुन्हेगारीकडे वळतो. ह्या समीतीच्या अहवालानंतर पंतप्रधानांनी जाहीर केले होते की देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचाच असला पाहिजे. त्यानुसार निरनिराळ्या योजना आखल्या गेल्या. केवळ मुसलमानी धर्मावरून शिष्यवृत्त्या दिल्या जात आहेत. तामिलनाडू व हैद्राबाद राज्यांमध्ये मुसलमानांना नोकर्‍यात पाच टक्के आरक्षण देण्यात आले आहे. असे सर्व बाजूंनी सर्वांनी हातभार लावल्याने आज हा समाज बराच प्रगत झाल्याचे दिसून येते आहे. समझौता एक्स्प्रेस स्फोटात ते नव्हते, मालेगावात नव्हते, मक्का मसजीदीत नव्हते, दिल्लीच्या बाटला एन्काऊन्टर मध्येही ते नव्हते, करकरेंच्या मृत्यूसही ते कारणीभूत नव्हते असे पुरावे सरकारकडे जमा होत आहेत.
आणि नेमके ह्याउलट हिंदू समाजाची वाटचाल गुन्हेगारीकडे व दहशतवादाकडे होऊ लागलेली आहे असा सबळ पुरावा आहे. भारतात हिंदू समाज बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहे. त्याची अशी दशा होऊ देणे हे कोणत्याही सरकारला फार काळ परवडणारे नाही. आधीच ह्या समाजातून प्रचंड प्रमाणात लोक इतर धर्मात जात आहेत. त्यात भर म्हणून की काय आताशा ते स्वत:च्या धर्माबद्दल उदासीनही झालेले आहेत. तशात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर ती एक सुरक्षेची चिंताच होणार आहे. म्हणूनच मुसलमान समाजाच्या प्रगतीत मोलाचा वाटा जसा साचर समीतीच्या अहवालाने उचलला, तसाच प्रयत्न आता हिंदूंसाठीही होणे नितांत गरजेचे आहे.
म्हणूनच आमचे निर्भीडपणे आवाहन आहे की सरकारने सर्व हिंदूंच्या उद्धारासाठी एक साचर समीती लवकरच नेमावी !